13 June 2019
21 टीएमसी पाण्यासंदर्भात संभाजीराजेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट - लवकरात लवकर तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
लोहारा प्रतिनिधी -
21 टीएमसी पाण्यासंदर्भात संभाजीराजेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट - लवकरात लवकर तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन.
तीन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी मराठवाड्याच्या दुष्काळी भागाचा अभ्यास दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात भेट दिली होती. यावेळी 21 टीएमसी पाण्याचा मुद्दा प्रामुख्याने समोर आला होता. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात पाठपुरावा करणार असा शब्द दिला होता. त्याप्रमाणे 21 टीएमसी पाण्यासंदर्भात खासदार छत्रपती संभाजीराजेंनी गुरुवारी ( दि. 13) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी दुष्काळी परिस्थिती व 21 टीएमसी पाण्यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
या भेटीदरम्यान खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिले. या पत्रात लिहिले आहे की, मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती समजून घेण्यासाठी मी तीन दिवसांपूर्वी अभ्यास दौरा केला. या दौऱ्यादरम्यान चारा छावण्या, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या भेटी, शेतकरी संघटनांच्या भेटी घेतल्या होत्या. यादरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. अनेक मुद्दे समोर आले. यात एक मुद्दा सर्वांकडून विचारला गेला तो म्हणजे 21 टीएमसी पाण्याचा. अनेक वर्षांपासून मराठवाडा या हक्कापासून वंचित आहे. तो त्यांना मिळाला पाहिजे. त्यामुळे आपण स्वतः यात तातडीने लक्ष घालून हा मुद्दा प्राधान्याने सोडवावा अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.
सरकार गंभीर असून लवकरात लवकर तोडगा काढला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजेना दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी निवेदन देताना छत्रपती संभाजीराजेंचे स्वीय सहाय्यक योगेश केदार उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment