16 August 2020
पंचायत समिती लोहारा येथे जागर अस्मिता मोहिमेचा शुभारंभ
प्रतिनिधी / लोहारा
मासीक पाळीच्या काळात महिला व किशोरवयीन मुलींनी सॅनिटरी नॅपकिनचा वापर करावा याबाबत जनजागृतीचे दृष्टीने शासनाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून अस्मिता प्लस योजना सुरू केली असून यामुळे खर्या अर्थाने महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब यांनी शनिवारी ( दि. १५) केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मार्फत राज्यात दिनांक १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीमध्ये मासीक पाळी बद्दल व्यापक जनजागृती व्हावी आणि सॅनिटरी नॅपकिन अस्मिता प्लस योजनेची ची माहिती तालुक्यातील प्रत्येक गावात व्हावी यासाठी जागर अस्मिता या मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोहिमेचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनी शनिवारी ( दि. १५) पंचायत समिती लोहारा येथे करण्यात आला. यावेळी सभापती रणखांब बोलत होत्या. यावेळी गटविकास अधिकारी अशोक काळे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढाकणे यांची उपस्थिती होती.
लोहारा तालुका अंतर्गत स्वयंसहाय्यता समूहाने एकूण ५६ अस्मिता प्लस नॅपकीनचे बॉक्सची ऑर्डर प्रत्येक गावातून केली आहे. तसेच सभापती हेमलता रणखांब यांच्या हस्ते सास्तुर येथील बौद्धीसत्व महिला स्वयंसहाय्यता समुहाची एका बॉक्सची ऑर्डर सभापती रणखांब यांच्या हस्ते अस्मिता अँप द्वारे करण्यात आली. तसेच हिप्परगा सय्यद येथील स्वयंसहाय्यता समूहातील महिला बालिका राजेंद्र मोरे यांनी सर्वाधिक बॉक्स ऑर्डर केले असून त्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुलीचे, महिलांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने अल्पदरात गावातच सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध होणार आहे. बाजारात सध्या असलेल्या नामांकित सॅनिटरी नॅपकिन च्या तुलनेत अस्मिता सॅनिटरी नॅपकिन कमी किमतीत व चांगल्या गुणवत्तेचे आहे. तसेच सॅनेटरी नॅपकिन विक्रीच्या माध्यमातून गावातील महिलांना आर्थिक फायदा होणार आहे. महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी जागर अस्मिता मोहीमेच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन २४ रूपयामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींना स्मार्ट कार्डच्या माध्यमातून फक्त 5 रूपयामध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचा शुभारंभ शनिवारी ( दि. १५) पंचायत समिती लोहारा येथे करण्यात आला. पुढील १५ दिवसामध्ये गाव पातळीवर विविध कार्यक्रम राबवून प्रत्येक कुटुंबापर्यंत मासीक पाळी व्यवस्थापन आणि त्याबद्दल व्यापक जनजागृती केली जाणार आहे. जागर अस्मिता मोहीम यशस्वी करण्यासाठी उमेद अभियानातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती, तालुका अभियान कक्षातील सर्व कर्मचारी, पंचायत समिती व विविध शासकीय विभाग परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमचे प्रास्तविक प्रणिता कटकदौंड यांनी केले. अमोल कासार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रीतम बनसोडे, सौरभ जगताप, प्रदीप लोंढे, संगीता सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment