01 March 2019

2 व 3 मार्चला विशेष मतदार नाव नोंदणी - वंचित राहिलेल्या मतदारांनी संधीचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


उस्मानाबाद , दि.१ -
लोकसभा निवडणुकीत एकही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे.अंतिम मतदारयादी जाहीर केल्यानंतर गत आठवड्यात आयोगाने दोन दिवसांची विशेष नोंदणी मोहीम घेतल्यानंतर पुन्हा चालू आठवड्यात शनिवारी आणि रविवारी (२ व ३मार्च)दोन दिवस विशेष पुनरिक्षण मोहीम घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे वंचित असलेल्या मतदारांनी ही शेवटची संधी असल्याचे समजून तात्काळ नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे. १जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.शिवाय २३ व २४ फेब्रुवारीला विशेष मोहीमही राबविण्यात आली आणि आता पुन्हा २ व ३ मार्चला ही मोहीम पुन्हा राबविण्यात येणार आहे.

*मतदारयादीतील नावाची खातरजमा करून घ्यावी*
मतदार ओळखपत्र आवश्यक असून मतदाराचे नाव यादीत असेल तरच मतदान करता येणार आहे.मतदार ओळखपत्र असले तरी नागरिकांनी मतदारयादीत आपल्या नावाची खातरजमा करून घ्यावी.विशेषतः १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवकांनी,पात्र दिव्यांग नागरिकांनी आणि महिलांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

*ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध*
मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अधिक माहिती www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांच्या सुविधेसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

*महिला मतदारांनी मतदार नाव नोंदणी तसेच मतदारयादीतील आपल्या नावाची खात्री करून घेण्याचे आवाहन*
येणाऱ्या निवडणुकीमध्ये महिला मतदारांनीही मतदानाचा आपला हक्क बजावावा, यासाठीदेखील निवडणूक आयोग तसेच जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने महिला मतदारांनीही मतदारयादीतील आपल्या नावाची खात्री करावी आणि आपले नाव मतदारयादीत नसल्यास आपल्या नावाची नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

*राजकीय पक्षांना सहभागाचे आवाहन*
मतदान केंद्राच्या ठिकाणी निरक्षर मतदारांसाठी मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे. गावांमध्ये मतदार यादीचे चावडीवाचनही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची माहिती सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्राकरिता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय सहाय्यकाची नेमणूक करण्यात येणार आहे.मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदारयाद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे,असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून राजकीय पक्षांना करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment