31 October 2019

उमरगा लोहारा तालुक्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा — आमदार ज्ञानराज चौगुले यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी




प्रतिनिधी / लोहारा

उमरगा - लोहारा तालुक्यातील परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणेबाबत शासनाकडे तात्काळ अहवाल पाठवावा अशी मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  मागील २० ते २५ दिवसांपासून उमरगा लोहारा तालुका व परिसरात पावसाने कहर केला असून नदी नाले तुडुंब वाहत आहेत. शेतीमध्ये काढणीला आलेले सोयाबीन पीक काढता येत नाही. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात पाण्यात आहे. काही ठिकाणी सोयाबीन पावसामुळे वाहून गेलेले आहे. तसेच काही ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटत आहेत. सोयाबीन, तूर आदी खरीप पिकांची पावसामुळे मोठी हानी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक वाया जाण्याची वेळ आली आहे. तरी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात यावा अशी मागणी आमदार चौगुले यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे केलेली आहे.

No comments:

Post a Comment