04 September 2020
कडदोरा येथील शेतकरी पिता पुत्राच्या खुनाचा गुन्हा महावितरण व कंत्राटदारावर दाखल करा - जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार
प्रतिनिधी / उमरगा
उमरगा तालुक्यातील कडदोरा येथील शेतकरी पिता पुत्राचा महावितरण कंपनीच्या दिरंगाईमुळे विजेच्या धक्याने मृत्यु झाला. या प्रकरणी विद्युत वितरण कंपनी व दोषी अधिकाऱ्यांवर तसेच कंत्राटदारावर खुनाचा गुन्हा दाखल करुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तहसीलदार संजय पवार यांना शुक्रवारी ( दि. ४) दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हणले आहे की, कडदोरा येथील शेतकरी काशिनाथ बाबूजी रनखांब व भीमसेन काशिनाथ रनखांब या पिता पुत्रांनी महावितरण कंपनीकडे ३१ जानेवारी २०१७ रोजी पत्नी श्रीमती विजयाबाई काशिनाथ रनखांब यांच्या नावे वीज जोडणी प्रस्ताव दाखल करून रीतसर शुल्क भरणा केला होता. महावितरण कंपनीच्या तीन वर्षांच्या अक्षम्य दिरंगाईमुळे व टोलवाटोलवी मुळे सदरील शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे पिके जगविण्यासाठी हतबल होऊन स्वतःच वीज वायर जोडत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. महावितरण कंपनीच्या अक्षम्य दिरंगाईमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या महावितरण कंपनी, संबंधीत जबाबदार दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर मयत शेतकरी कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी. सदरील मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानिस महावितरण व प्रशासन जबाबदारी राहील असा ईशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष संजय पवार, जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन राम जाधव, विधानसभा कार्याध्यक्ष अमोल पाटील, तुकाराम रणखांब, बालाजी रणखांब, प्रदीप बालकुंदे, सरपंच शमशोद्दीन जमादार, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक नेताजी कवठे, प्रताप जाधव, सुभाष गायकवाड, मोहन गायकवाड आदींच्या सह्या आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment