प्रतिनिधी / लोहारा
दुष्काळी परिस्थितीमुळे मागील अनेक वर्षांपासून शेतकरी संकटात आहे. आणि आता मुबलक पाणी उपलब्ध असतानाही विजेच्या समस्यांमुळे शेतकरी अडचणीत येत आहे. त्यामुळे प्राधान्याने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अशी सूचना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी लोहारा येथील बैठकीत केली.
आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षस्थानी सोमवारी (दि. २७) तहसील कार्यालयाच्या सभागृहात बैठक संपन्न झाली. यावेळी प्रभारी तहसीलदार रणजित शिराळकर, प्रभारी गटविकास अधिकारी अशोक काळे, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बीडबाग, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस.डी. माले, वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता ए.एम. गोकुंदे, पोलिस उपनिरीक्षक आनंद वाठोरे, लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता ई.टी. सूर्यवंशी, पंचायत समितीचे माजी सभापती सिद्रामप्पा दुलंगे, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा आमदार ज्ञानराज चौगुले यांनी घेतला. या बैठकीत नागरिकांनी घरकुल सह विविध समस्या मांडल्या. परंतु सध्या मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. रब्बी हंगाम बहरला असताना वीजपुरवठा मात्र सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे रब्बी पिकांना पाणी देता येत नाही. शिवाय तालुक्यातील अनेक ठिकाणचे रोहित्र नादुरूस्त आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी करूनही महिना-महिना रोहित्राची दुरूस्ती केली जात नाही. त्यामुळे विजेअभावी रब्बी हंगाम धोक्यात येत असल्याच्या व गावात पाणीपुरवठा करण्यासाठी अडचण येत असल्याच्या तक्रारी लोहारा शहरासह हिप्परगा रवा, कानेगाव, उंडरगाव, जेवळी, नागूर, सास्तूर, येथील शेतकऱ्यांनी केल्या. तसेच वीज वितरण कंपनी चे अधिकारी, कर्मचारी तक्रार घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांना उद्धटपणे बोलतात अशा तक्रारीही अनेकांनी केल्या. त्यावर बोलताना आ. चौगुले यांनी वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता ए.एम. गोकुंदे यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सामंजसाने समजून घेऊन प्राधान्याने सोडवावे, तक्रारी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीची नोंद रजिस्टर मध्ये घेऊन त्या प्रमाणे त्याची सोडवणूक करावी, कोणत्याही शेतकरी, नागरिकांना उद्धटपणे न बोलता त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी अशा सूचना केल्या. तसेच नायब तहसिलदार रणजित शिराळकर यांनाही वीज वितरण कंपनी संबंधित शेतकरी, नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची सूचना केली.
शासनाकडून वीज वितरण कंपनीला दीड कोटी रूपये देण्यात आले आहेत. रोहित्राची तत्काळ दुरूस्ती करून तालुक्यात अखंडित वीजपुरवठा करा, यात कसल्याही प्रकारची कुचराई केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा सज्जड दम आमदार चौगुले यांनी अधिकाऱ्यांना दिला. या बैठकीस बाजार समितीचे उपसभापती प्रा. आनंद सूर्यवंशी, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, नगरसेवक श्याम नारायणकर, गगन माळवदकर, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, श्रीकांत भरारे, भाजप शहराध्यक्ष आयुब शेख, नामदेव लोभे, हिप्परग्याचे सरपंच राम मोरे, मार्डीचे उपसरपंच दत्ता पाटील, उमाकांत लांडगे, जगन्नाथ पाटील, श्रीकांत पाटील, कुलदीप गोरे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.



No comments:
Post a Comment