16 May 2020

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या आवाहनाला दक्षिण जेवळी ग्रामस्थांची साथ



प्रतिनिधी / लोहारा

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दानाला अतिशय महत्व आहे. श्रीमंत, गरीब सर्वजण आपापल्या ऐपती नुसार दान करतात आणि आपल्या देशात हा माणुसकीचा झरा जिवंत आहे याचा प्रत्यय अवघ्या दोन तासात महादान जमा करून द. जेवळीच्या गावकऱ्यांनी दिला आहे असे प्रतिपादन स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी बुधवारी ( दि. १३) जेवळी येथे केले.
            कोरोना विषाणूच्या महामारीने संपूर्ण जग हवालदिल झालेले आहे. लॉकडाऊन मुळे संपूर्ण व्यवहार ठप्प आहेत. अनेक रुग्ण, गरोदर माता यांना यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या या महामारीत अने रुग्ण गरोदर माता स्पर्श ग्रामीण रुग्णालयात हक्काने, आशेने येत आहेत. त्यामुळे दररोज स्पर्श ग्रामीण रुग्णालयात रुग्ण व गरोदर मातांची खूप गर्दी वाढत आहे. अशा परिस्थितही दीपस्तंभा प्रमाणे स्पर्श आपली आरोग्य सेवा देत आहे. परंतु रुग्णाची वाढती गर्दी लॉकडाऊन मुळे स्वतःच्या गावी जाण्यास सोय उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना संपूर्ण दिवस रुग्णालयात थाबावे लागते. रुग्णांची हि अडचण लक्षात घेऊन अशा रुग्णांसाठी व गरोदर मातांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी स्पर्श मार्फत दररोज मोफत भोजन व वाहतूक सुविधा दिली जात आहे. पण त्यामध्ये खूप अडचणी येत होत्या. विशेषतः अन्न धान्याची अडचण मोठी होती. त्यामुळे इच्छा असूनही सुविधा पुरविण्यात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन स्पर्श ग्रामीण रुग्णालयामार्फत परिसरातील ग्रामस्थांनी धान्य व इतर स्वरुपात मदत करावी असे आवाहन करण्यात आले होते. तालुक्यातील दक्षिण जेवळी येथील ग्रामस्थांनी स्पर्शच्या या आवाहनाला बुधवारी ( दि. १३) प्रतिसाद देत अवघ्या दोन तासांत ५ क्विंटल गहू, ५ क्विंटल ज्वारी, २ क्विंटल तांदूळ, ५० किलो तुरडाळ, ५० किलो मुगडाळ, १०० किलो शेगदाणे, २५ किलो साखर, ४० पाकीट गोडेतेल, ५० किलो काकडी इ. साहित्य अवघ्या २ तासात जमा करून या संपूर्ण वस्तू गोळा करून स्पर्श ग्रामीण रुग्णालयास दिल्या. दक्षिण जेवळी ग्रामस्थांच्या या दातृत्वाने भाराउन गेलो व त्यामुळे कोरोनाच्या या महामारीच्या लॉकडाऊनच्या काळात रुग्णांना कसलीच अडचण येणार नाही याची संपूर्ण काळजी स्पर्श ग्रामीण रुग्णालय घेईल अशी हमी स्पर्श चे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी यावेळी बोलताना दिली. तसेच दक्षिण जेवळी ग्रामस्थांचा आदर्श परिसरातील इतर गावांनी घेऊन या कोरोनाच्या संकटामध्ये इतराना मदत करावी व गावांनी एक होऊन परिसरातील गरीब समूहापर्यंत मदत पोहचवावी. दक्षिण जेवळीच्या ग्रामस्थांनी केलेल्या मदतीमुळे स्पर्श ग्रामीण रुग्णालयात आहाराबाबतच्या सुविधा वाढून रुग्ण व नातेवाईक यांना काही कमी पडणार नाही याची संपूर्ण खबरदारी घेतली जाईल असेही रमाकांत जोशी यांनी सांगितले. तसेच दक्षिण जेवळी ग्रामस्थांचे आभार मानले.
                    खऱ्या अर्थाने सामाजीक बांधिलकी जोपासून उदात्त भावनेतून मदत जमा केली. दक्षिण जेवळी येथील सामाजिक कार्यकर्ते बसवराज होनाजे, सरपंच चंद्रकांत साखरे, उपसरपंच पार्वतीबाई पाटील, शिवराज चिलगुंडे, मुख्याध्यापक बी एम बिराजदार, जेष्ठ नागरिक आण्णाप्पा कोरे गुरुजी, दौलप्पा तोरकडे, वीरभद्र स्वामी, धुळाप्पा होणाजे, अशोक भूसाप्पा, संभाजी कारभारी व गावातील युवक गट यांनी गावकऱ्यांना या मदतीचे आवाहन करताच अवघ्या दोन तासात वरील साहित्य जमा झाले. एका गरीब मातेने तिच्या रोजंदारीच्या पैशामधून २ किलो शेंगदाणे रमाकांत जोशी यांच्याकडे देताच करताच उपस्थित सर्वजण भाऊक झाले व माणुसकीचा झरा अद्यापही जिवंत असल्याचा प्रत्यय आल्याचे उपस्थितांनी सांगितले.

No comments:

Post a Comment