29 July 2020
उस्मानाबाद जिल्ह्यातील पवनचक्क्या पावसाळ्यात बंद ठेवाव्यात - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मनसेची निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी / लोहारा
उस्मानाबाद जिल्ह्यातील पवनचक्क्या पावसाळ्यात बंद ठेवाव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांना हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हणले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. सर्वसामान्य माणसातून व शेतकऱ्यांतून असा समज आहे की, यावर्षी जिल्ह्यात चालू झालेल्या पवनचक्कीमुळे आलेले ढग पुढे सरकत जात आहेत. त्यामुळे पाऊस कमी होताना दिसत आहे. तरी या संदर्भात शासन स्तरावर चौकशी समिती नेमून जर पावसावरती या पवनचक्क्याचा परिणाम होत असेल तर पावसाळ्यात या पवनचक्क्या तात्काळ बंद करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात याव्यात. याची प्रशासनाने योग्य वेळी दखल नाही घेतली तर जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्यांना आवश्यक शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. मराठवाडा नेहमी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यात उस्मानाबाद जिल्हा अतिदुष्काळी म्हणून शासन दरबारी नोंद आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसांत पवनचक्क्या बंद करून शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम शासन व प्रशासनाने करावे अन्यथा या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा या निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर मनसेचे जिल्हा संघटक अमराराजे कदम, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष जालिंदर कोकणे, जिल्हा सचिव दादा कांबळे, अजित पवार, अमोल सलगरे आदींच्या सह्या आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment