12 July 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या आ. सुजितसिंह ठाकुर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांचे खरमरीत उत्तर



उस्मानाबाद प्रतिनिधी -

भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी शनिवारी ( दि. ११) ट्विटरद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
              प्रा. बिराजदार यांनी आ.  ठाकूर यांच्या टीकेला उत्तर देताना म्हणले की,  स्वर्गीय इंदिरा गांधी पासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेकांनी आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचं नेतृत्व, कर्तृत्व मान्य केलं आहे.  असे असतानाही कधीही विधानसभेची निवडणूक न लढवता विधीमंडळात मागच्या दाराने प्रवेश केलेल्या व्यक्तीने ज्यांची तब्बल ५० वर्षांची उत्तुंग, अपराजित राजकीय कारकीर्द राहीली आहे अशा लोकनेत्यावर  टीका टिपणी करायचं म्हणजे थोडं हास्यास्पद आहे. अनेक राज्यात तोडफोडीचे राजकारण करून सत्ता हस्तगत केलेल्या पक्षाच्या जनाधार नसलेल्या नेत्याने नैतिकतेच्या, अनैसर्गीकतेच्या गप्पा माराव्यात हे सदसद्विवेकबुद्धीला न पटण्यासारखे आहे.
                विधानसभेत सर्वाधिक संख्या येऊन देखील या महाराष्ट्रासाठी संकटकाळात काय योगदान दिलं त्याचं आत्मपरीक्षण विरोधी पक्षाने व त्यांच्या वाचाळवीर नेत्यांनी करावं. महाराष्ट्रातील जनतेने तुमच्या सत्ताकाळात महाराष्ट्रावरती आलेल्या पुराच्या  संकटाचा सामना करताना आपल्या कामाची दखल विधानसभा निवडणूकीत घेतलीच की ! तुमच्या प्रदेशाध्यक्षाला स्वतःचा मतदार संघ सोडुन सुरक्षित ठिकाणी जावं लागलं. म्हणुनच तुम्हाला सत्तेबाहेर करण्यात त्या भागाचा वाटा जास्त राहीला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार, आमदार हे तुमच्या तीनशे खासदाराला आणि १०५ आमदारांना कामाच्या बाबतीत केंद्रात आणि महाराष्ट्रात भारी पडले हे तुम्ही परवा संसदरत्न, महासंसदरत्न पुरस्कार मिळाले तेव्हा तुमच्या निदर्शनास नाही आले वाटतं. आकडेवारीत फापट पसारा गोळा करुन काम न करणाऱ्या खासदारापेक्षा आमच्या पक्षातील कर्तृत्ववान खासदार तुमच्या तीनशेला नक्कीच भारी आहेत. राहीला प्रश्न महाराष्ट्राचा, तर विधानसभा निवडणूकीपुर्वी तुम्ही जे वातावरण तयार केलं, महाराष्ट्रात जे फोडाफोडीचं राजकारण केलं, ते कोणत्या नैतिकतेला धरून होतं याचं आत्मपरिक्षण करावं. पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांची बरोबरी नसणाऱ्या स्टंटबाज नेत्यांनी कर्तृत्व नसताना लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. पवार साहेबा सारख्या व्यक्तीमत्वा वरती बोलण्याआधी विचार करून बोलावं. अविचाराने साहेबावरती टिका करणारे तुमच्याच पक्षातील दिग्गज नेते आज साहेबांना राजकारणातील आपला पितामह समजत निवडणूकीपुर्वी केलेली टिका झाकण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत. तुमच्यावरती तशी वेळ येऊ नये एवढीच आमची इच्छा ! कारण पवार साहेबांनी त्यांच्यावर टिका करणाऱ्याकडे एकदा लक्ष दिलं की त्याच पुढे काय होतं हे तुमच्या माजी मुख्यमंत्र्याना विचारा. त्यांच्यावर आलेल्या केविलवान्या परिस्थीतीचा अंदाज घेत चला म्हणजे आपली राजकीय कारकीर्द टिकुन राहील असे खरमरीत उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी दिले आहे.

1 comment: